
भुसावळ महसूल प्रशासन वारंवार पाठपुरावा करून देखील लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांनी स्वखर्चाने केले रस्ता रुंदीकरण
भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हापानाचे ते मिरगव्हाण शेतशिवारातील पाणंद रस्त्याच्या दुरुस्ती आणि रुंदीकरणासाठी शेतकऱ्यांनी स्वत:हून पुढाकार घेतला आहे. सरकारी यंत्रणेकडून सात वर्षांपासून कोणतीही मदत मिळाली नसल्याने गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रत्येकी ५,००० रुपये लोकवर्गणी जमा केली. या निधीतून रस्त्याचे रुंदीकरण, अडचणीचे वृक्ष तोडणे आणि भराव टाकून सपाटीकरण करण्यात आले आहे.

या कामामुळे आता रस्ता पूर्णपणे मोकळा झाला असून, शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह इतर मोठी वाहने शेतीच्या कामासाठी सहज वापरता येत आहेत. यापूर्वी रस्त्याच्या अडचणीमुळे सुपीक जमिनी असूनही केळीचे पीक घेता येत नव्हते. आता विहिरींमध्ये पाण्याची उपलब्धता असल्याने अनेक शेतकरी केळी लागवडीचे प्रयत्न करत आहेत, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक प्रगतीच्या दार्या खुल्या होण्याची शक्यता आहे. या भागात ज्वारी, गहू, टरबूज, मका आणि वांगी ही प्रमुख पिके घेतली जातात.
दुसरीकडे, या परिसरात गेल्या काही वर्षांपासून नीलगाईंचा प्रचंड त्रास वाढलेला आहे. नीलगाईंमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, वन विभागाकडून कोणतीही ठोस उपायोजना न केली जात नाही. आणि योग्य नुकसान भरपाई देखील मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे न्याय मिळवण्याची मागणी करण्यात आली आहे.

याच कुऱ्हापानाचे गावातील भुसावळ रोडवर असलेल्या सौरंभ ट्रेडिंग कंपनीच्या जिनिंग अँड प्रेसिंग मिलमधून उडणाऱ्या कपाशीच्या धूळ, झिंज आणि डस्टमुळे जिनच्या मागील बाजूस असलेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ, जळगाव यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही मिल मालकावर कोणतीही उचित कारवाई झाली नाही. यामुळे पीडित शेतकरी अण्णा शिंदे यांनी आता न्याय मिळवण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांनी भुसावळ तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी जळगाव यांना सातत्याने पत्रव्यवहार करूनही कोणताही परिणाम झाला नाही. अखेर स्वत:च्या खर्चाने रस्ता मोकळा करून शेतीसाठी नवीन आशा निर्माण केली आहे, मात्र नीलगाई आणि प्रदूषणाच्या समस्यांवर तातडीने कारवाईची गरज व्यक्त केली जात आहे.













